महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० ऑगस्ट । जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kashmir) कटरा येथे मुसळधार पावसामुळे वैष्णोदेवी यात्रा तात्पुरती स्थगित (Vaishnodevi Yatra temporarily stop) करण्यात आली आहे. कटरामध्ये शुक्रवारी सायंकाळी मुसळधार पाऊस सुरू झाल्याने कटरा ते भवन हा प्रवास थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे 27,914 भक्तानी यात्रेसाठी नाव नोंदणी केली होती, त्यांना आता थांबवण्यात आले आहे. माता वैष्णोदेवी बोर्डाचे सीईओ अंशुल गर्ग यांनी यावेळी सांगितले की, परिस्थिती नियंत्रणात असून या परिस्थितीवर प्रशासनाकडून लक्ष देण्यात आले आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, यात्रेच्या मार्गावर सध्या पाणी नसले तरी खबरदारीचा उपाय म्हणून कटरा ते भवन हा प्रवास थांबवण्यात आला आहे. कटरा (Katra Heavy Rain)येथील भवनातून जाणाऱ्या प्रवाशांना मज्जाव करण्यात आला आहे. श्राइन बोर्डाचे कर्मचारी, पोलीस आणि सीआरपीएफ जवानांच्या कडक देखरेखीखाली सांजीछत आणि नंतर कटरा या दिशेने येणाऱ्यांवर लक्ष देण्यात आले आहे.
या परिसरात मुसळधार पावसाला सुरूवात झाली असली तरी आतापर्यंत कोणत्याही भक्ताला कोणतीही इजा झालेली नाही. त्यामुळे येत्या काही तासात पाऊस जर थांबला तर कटरा येथून प्रवास सुरू होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी संध्याकाळी भवन परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे हिमकोटी (बॅटरी कार) ट्रॅक प्रवासासाठी बंद करण्यात आला असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
#WATCH | J&K: Heavy rainfall triggers flash floods near Vaishno Devi Shrine in Katra town in Reasi district pic.twitter.com/NhgxNjbV9x
— ANI (@ANI) August 19, 2022
सध्या पावसामुळे थांबवण्यात आलेल्या भक्तांना दिलासा देण्यात येत असून त्यांना अर्ध्या अर्ध्या तासाने परिसरातील सर्व माहिती पोहचवण्यात येत आहे. आपत्ती व्यवस्थापन पथके आणि वैद्यकीय तुकड्या सतर्क असून गरज पडल्यास कोणत्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तरी ती हातळता येईल असंही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
मे महिन्यामध्ये माता वैष्णोदेवी मंदिराजवळील जंगलात आग लागली होती. ही बाब लक्षात घेऊन खबरदारी म्हणून माता वैष्णोदेवी यात्रेचा नवा मार्ग बंद करण्यात आला होता मात्र, जुन्या मार्गावरील प्रवास पूर्वीप्रमाणेच सुरू ठेवण्यात आला होता. त्यावेळी त्रिकुटा डोंगराच्या जंगलात आग लागली होती. त्यामुळे बॅटरी कार सेवा असलेला मार्ग बंद करण्यात आला होता. सांझी छत हेलिपॅडजवळील परिसरात ही आग लागली. त्रिकुटा टेकड्यांमध्ये जोरदार वारे आणि कमी दृश्यमानता यामुळे खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.