महाराष्ट्र 24 – ऑनलाईन – मुंबई – विशेष प्रतिनिधी – . महाराष्ट्र दिनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जनतेला आरोग्यदायी भेट दिली असुन महात्मा फुले जनआरोग्य योजनेत राज्यातील 100 टक्के लोकसंख्येचा समावेश करण्यात आला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत ट्विट केले आहे. यामुळे, कोरोना रुग्णांकडून अवाजवी दर आकारणाऱ्या खासगी रुग्णालयांच्या मनमानीला चाप बसणार आहे.
महाराष्ट्र हे एकमेव राज्य – महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून राज्यातील 100 टक्के जनतेला मोफत आरोग्य उपचार देण्याचा महत्वपूर्ण निर्णय काल महाराष्ट्र दिनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहिर केला. राज्यातील नागरिकांना मोफत आणि कॅशलेस विमा संरक्षण देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले. दरम्यान, कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करताना मुंबईतील काही खासगी रुग्णालयांकडून मनमानी पद्धतीने दर आकारणी केली जात आहे. तिला चाप लावण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याची माहितीही आरोग्यमंत्र्यांनी दिली.
महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून राज्यातील १०० टक्के जनतेला मोफत आरोग्य उपचार देण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज महाराष्ट्र दिनी जाहिर केला. राज्यातील नागरिकांना मोफत व कॅशलेस विमा संरक्षण देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य.#CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak
— Rajesh Tope (@rajeshtope11) May 1, 2020
महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून राज्यातील एकूण लोकसंख्येपैकी 85 टक्के नागरिकांना लाभ दिला जात होता. आता उर्वरित 15 टक्के लोकसंख्येचाही ज्यामध्ये शासकीय, निमशासकीय कर्मचारी, पांढरे शिधापत्रिकाधारक यांचाही या योजनेंतर्गत समावेश करण्यात येणार असून राज्यातील सामान्य नागरिकांच्या उपचारावरील आर्थिक खर्चाची काळजी घेणारा निर्णय आरोग्यमंत्र्यांनी आज जाहीर केला.
खासगी रुग्णालयांना ‘हे’ नियम बंधनकारक – मुंबई, पुण्यातील ज्या मोठ्या रुग्णालयांचे जीप्सा (जनरल इन्शुरन्स पब्लिक सेक्टर असोशिएशन) सोबत करार झाले आहेत आणि विविध आजाराच्या उपचारासाठी विविध पॅकेजेस ठरलेले आहेत. रुग्णालयांनी कोरोना रुग्णांवर उपचार करतांना जे दर निश्चित आहेत त्याप्रमाणेच आकारणी करायची आहे. मग रुग्ण कुठल्याही प्रकारच्या वॉर्डमध्ये का असेना त्यापेक्षा जास्त दर रुग्णालयांना आकारता येणार नाही, असा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून तो खासगी रुग्णालयांना बंधनकारक असणार आहे.
मुंबई, पुण्यातील ज्या रुग्णालयांचे जीप्सासोबत करार नाहीत त्यांच्यासाठी दरसुची निश्चित करण्यात आली आहे. त्या दरसुचीपेक्षा अधिकची आकारणी मग रुग्ण कुठल्याही प्रकारच्या वॉर्डमध्ये असेल ती करता येणार नाही. उपचारादरम्यान, पीपीई कीटस्, एन 95 मास्क वापरल्यास खरेदी किमतीच्या 10 टक्के दर वाढीव दर लावण्यास मुभा देण्यात आली आहे.उर्वरित महाराष्ट्रातील रुग्णालयांनी जे विविध थर्ड पार्टी अग्रीमेंट (टीपीए) त्यानुसार एकाच उपचारासाठी दर निश्चित केले आहेत. त्यापैकी जनरल वॉर्डच्या किमान दरापेक्षा अधिकचे दर त्यांना आकारता येणार नाहीत. जालन्यातील एका कार्यक्रमात आरोग्य मंत्र्यांनी ही माहिती दिली आहे.