महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२४ मार्च । अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले आहे. रब्बी पिकांची नासाडी झाली असून बळीराजा संकटात सापडला आहे. मात्र अजूनही महाराष्ट्रात सुरु असणाऱ्या अवकाळी पावसाने अद्यापही राज्यातून काढता पाय घेतलेला नाही. त्यातच हवामान विभागाकडून पुन्हा एकदा राज्यातील काही भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये पुन्हा एकदा धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे.
राज्यातील कोकण किनारपट्टी आणि मुंबईत गुरुवारी ढगाळ वातावरण होते. ज्यानंतर आज म्हणजेच शुक्रवारचा दिवस प्रखर सूर्यप्रकाशाने झाला. मात्र शहर आणि राज्यावरून अद्यापपर्यंत पावसाचे सावट पूर्णपणे गेलेले नाही.
हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करत हवामानाची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की शुक्रवारपासून राज्यातील मराठवाडा, उत्तर मध्य महाराष्ट्र, धुळे नाशिक, नंदुरबारसह विदर्भातही काही भागांमध्ये मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरुपातील पावसाच्या सरी बरसतील. अवकाळीचे परिणाम सोलापूरमध्येही दिसून येतील.
ढगाळ वातावरणाचा अंदाज
पश्चिमी विक्षोभाच्या प्रभावामुळे उत्तर, मध्य आणि पश्चिम भारतावर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे राज्यात विदर्भामध्ये 25 ते 27 मार्चदरम्यान हलक्या ते मध्यम पावसासह गारपीट तर कोकण, उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह ढगाळ वातावरणाचा अंदाज हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी देखील वर्तवला आहे.
याठिकाणी असे असेल वातावरण
रत्नागिरी, सिंधुदुर्गसह मुंबईमध्ये दोन दिवस तर 26 मार्चपर्यंत नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, परभणी, बीड या जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहणार असून तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे.