महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .८ एप्रिल । खासगी सीबीईसी बोर्डाच्या शाळांमधून आठवीपर्यंतचे शिक्षण आरटीई योजनेअंतर्गत पूर्ण होणाऱया मुलांच्या पालकांसमोर आता आर्थिक संकट उभे राहिले आहे. नववीपासून खासगी शाळांमध्ये मुलांना शिक्षणासाठी हजारो रुपयांची पूर्ण फी भरावी लागणार आहे. त्यामुळे या मुलांबरोबर पालकांचीही झोप उडाली आहे. दरम्यान, शाळांच्या संचालकांनी नियमावर बोट ठेवून आपला नाइलाज असल्याचे म्हटले आहे.
राज्यात शैक्षणिक वर्ष 2014-15 पासून आरटीईअंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षणात समान संधी देण्यासाठी सर्व व्यवस्थापन शाळांमध्ये राखीव 25 टक्के कोटय़ाखाली विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास सुरुवात झाली. राज्यभरात पहिल्या वर्षी सुमारे 25 हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत. त्यांना आठवीपर्यंत मोफत शिक्षण दिले जात होते, मात्र आता हे विद्यार्थी नववीत जाणार असल्यामुळे या विद्यार्थ्यांना नियमानुसार पूर्ण शुल्क भरण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, वर्षाची फी 90 ते 95 हजारांच्या आसपास जात असल्यामुळे सर्वसामान्यांनी हे पैसे आणायचे कुठून, असा प्रश्न पालकांना पडला आहे.