महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २० एप्रिल । वाढता उन्हाळा आणि हवामानात सातत्यानं होणारे बदल पाहता महाराष्ट्र राज्य प्रशासन आता सावधगिरीची पावलं उचलताना दिसत आहे. प्राथमिक स्तरावर उष्माघातापासून बचाव करण्यासाठी एकिकडे राज्याच्या विभागानं नागरिकांच्या हितार्थ काही मार्गदर्शक सूचना जारी केलेली असतानाच आता शाळांबाबतही मोठा निर्णय घेतला जाणार आहे.
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनीच मे महिन्याच्या सुट्टीच्या अनुषंगानं महत्त्वाचं वक्तव्य करत विद्यार्थ्यांच्या परीक्षा झाल्या असतील आजच शाळांना सुट्ट्या जाहीर करा असं वक्तव्य केलं. यासंदर्भातील अधिकृत माहिती शासनातर्फे जारी केल्या जाणाऱ्या एका परिपत्रकातून देण्यात येईल असंही ते म्हणाले.
उन्हाळी सुट्ट्यांदरम्यान विद्यार्थ्यांना अभ्यास देऊ नये, या म्हणण्यावर जोर देत त्यांनी राज्यातील शाळा 13 ऐवजी 15 जून रोजी सुरु होणार असल्याचं सांगितलं. सोबतच विदर्भात मात्र शाळा 30 जून सुरु होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. शालेय शिक्षण मंत्र्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळं आणि दिलेल्या निर्देशांमुळं यंदाच्या वर्षी विद्यार्थ्यांना जास्तीची सुट्टी मिळणार असल्यामुळं बच्चेकंपनीमध्ये मात्र आनंदाची लाट आहे.
दरम्यान, राज्यातून अवकाळीचा प्रभाव कमी होत असतानाच एप्रिल महिन्याच्या अखेरपासून उन्हाचा तडाखा दिवसागणिक वाढतच चालला आहे. अशा परिस्थितीत यंदा शाळांना मे महिन्याची सुट्टी एप्रिलपासून देण्यात येत असल्याचं केसरकरण म्हणाले. शाळांतील परीक्षांचा अहवाल मागवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान या संपूर्ण परिस्थितीसंदर्भात मंत्रालयात थोड्याच वेळात बैठक होणार असल्याचं कळत आहे. यावेळी मराठी भाषेचा वापर, शालेय परीक्षा आणि मूल्यांकन पद्धतीवरही त्यांनी भाष्य केल्याचं पाहायला मिळालं.
निसर्गाचा प्रकोप झाला आणि…
काही दिवसांपूर्वीत खारघर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यादरम्यान उष्माघातानं मृत पावलेल्यांचा आकडा वाढल्यामुळं सध्या विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, या मुद्द्यावर भाष्य करताना सदरील कार्यक्रम सायंकाळी घेण्याचा पर्याय मुख्यमंत्र्यांनी सुचवल्याचं सांगितलं. पण, श्री सेवकांना दूरचा प्रवास करावा लागणार असल्यामुळं वेळ बदलण्यात आली. इथं शिस्तबद्ध सेवक आले होते, सोबत डबे आणि पाण्याच्या बाटल्याही त्यांनी बाळगल्या होत्या. पण, निसर्गाचाच प्रकोप झाला असं म्हणत त्यांनी सरकारची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.