महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .३ मे । जेष्ठ नेते शरद पवार साहेबांनी पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती माध्यमातून समजली. ती धक्कादायक आहे. महाभारतात श्री कृष्णाने मी शस्त्र हातात घेणार नाही, असा पण केला होता. मात्र जागेवर बसून मार्गदर्शन केले तरी सुध्दा युध्दात चमत्कार घडवून आणला होता. पवार साहेब असेच आमचे उत्तुंग नेते आहेत. नुसते जागेवर बसून व मार्गदर्शन करूनही कलाटणी घडवण्याची ताकद त्यांच्यामधे आहे.
त्यामुळे ते जो काही निर्णय घेतील तो योग्यच असेल. आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी असू, अशी प्रतिक्रिया खासदार श्रीनिवास पाटील यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या शरद पवार यांच्या राजकीय आत्मकथेच्या सुधारित आवृत्तीचं प्रकाशन आज मुंबई येथे झालं. त्यावेळी पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला.
त्यावर प्रतिक्रीया देताना खासदार पाटील म्हणाले, शरद पवार आणि मी 1958 पासून युवक कॉंग्रेसमधून सुरूवात केली. त्यांनी सलग 65 वर्षे केलेली समाजसेवा, त्यातील 55 वर्ष लोकप्रतिनिधित्व केल्यानंतर आता पुढच्या पिढीसाठी काहीतरी करण्याचा साहेबांची इच्छा दिसतेय. त्यामुळे ते सांगतील ते धोरण आणि जे बांधतील ते तोरण हिच आमच्या सारखा कार्यकर्त्याची भूमिका राहिल. फक्त ते पदावर राहणार नाहीत असे दिसून येत आहे.
शरद पवार यांचे नेतृत्व केवळ पद आणि निवडणुका पुरते मर्यादित नसून ते व्यापक व्यक्तिमत्व आहेत. पुढच्या पिढीला काहीतरी भरीव देण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी, जबाबदारी असलेल्या संस्थांना अधिक प्रभावी करण्यासाठी ते जास्त वेळ देणार आहेत असे दिसते. याचा अर्थ ते पूर्णपणे निवृत होतायतं असे नाही.